प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा रंगत असताना वास्तव मात्र अजूनही वेगळंच चित्र दाखवत आहे.
सोलापूर (Child Marriage) : प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा रंगत असताना वास्तव मात्र अजूनही वेगळंच चित्र दाखवत आहे. बालविवाहासारखी कुप्रथा अजूनही ग्रामीण भागात जिवंत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा लग्नानंतर काही महिन्यांतच मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बावची-निंबोणी परिसरातील या मुलीचं काही महिन्यांपूर्वी बालविवाह करण्यात आला होता. बालपण जगायचं वय असताना तिच्यावर संसाराची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र लग्नानंतर फार काळ न जाताच तिच्या आयुष्यात अडचणींची मालिका सुरू झाली. सासरच्या मंडळींकडून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षण घेण्याच्या वयात छळ सहन करावा लागल्याने ती अत्यंत त्रस्त झाली होती. अखेर या परिस्थितीला कंटाळून तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मंगळवेढा पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एवढ्या कमी वयातील मुलीचा विवाह कसा झाला? स्थानिक पातळीवर याची कुणालाच कल्पना नव्हती का? बालविवाह रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बालविवाहाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.