पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
देवदर्शनासाठी आलेल्या मुलाचा पाय घसरला; पालम पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
परभणी (Child Drowned) : पालम तालुक्यातील मौजे फळा परिसरातील गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई कैलास पवार (वय १२, रा. रायवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) हा आपल्या कुटुंबीयांसह मौजे फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी तो गोदावरी नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी उतरला. मात्र त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला व तो खोल पाण्यात गेला.
घटनेनंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती वडील कैलास पवार यांनी पालम पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांगणे आणि पोलीस हवालदार विलास बळवंते करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे रायवाडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, नदी, तलाव, धरणे आणि इतर जलाशयांमध्ये अंघोळ किंवा पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.