अर्थसंकल्पीय रस्ते योजनेअंतर्गत मंजूर असलेला चिखली तालुक्यातील एकलारा ते पाटोदा हा महत्त्वाचा रस्ता अखेर मार्गी लागला.
ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
चिखली (Chikhli Road Development) : अर्थसंकल्पीय रस्ते योजनेअंतर्गत मंजूर असलेला चिखली तालुक्यातील एकलारा ते पाटोदा हा महत्त्वाचा रस्ता अखेर मार्गी लागला असून, महसूल विभागाच्या पुढाकाराने प्रत्यक्ष स्थळी जाऊन अडचणी दूर करत कामाला सुरुवात करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन 2023-24 मध्ये माननीय आमदार श्वेताताई महाले यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यास मंजुरी मिळाली होती. सुमारे 1.5 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यास अंदाजे 100 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता एकलारा व पाटोदा या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.
मात्र, काही कास्तकारांच्या अडचणी व जागेच्या प्रश्नामुळे सदर रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. रस्ता रखडल्यामुळे शेतमाल वाहतूक, शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी तहसील विभागाकडे वारंवार निवेदने देत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार विजय सवडे यांच्या आदेशानुसार 30 एप्रिल 2026 रोजी नायब तहसीलदार महसूल मुरलीधर गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट दिली.
यावेळी संबंधित कास्तकारांना समक्ष बोलावून चर्चा करण्यात आली. रस्त्याची प्रत्यक्ष आखणी करून सर्वांच्या सहमतीने मार्ग मोकळा करण्यात आला. महसूल विभागाने समन्वयाची भूमिका घेतल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला.
यानंतर कंत्राटदाराने उपलब्ध करून दिलेल्या दोन जेसीबीच्या सहाय्याने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. रस्ता खुला झाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.
या प्रसंगी एकलारा व पाटोदा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संबंधित विभागाचे अभियंते, महसूल विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या पुढाकारामुळे रखडलेले काम मार्गी लागल्याने परिसरातील विकासाला गती मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.