Malgani-Valti Farm Road: चिखली तालुक्यात शेतरस्ते प्रकटीकरणाच्या अभियानाला वेग येत असून, शरद पाटील यांनी मालगणी फाटा ते वळती हा शेतरस्ता पाहिला.
उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी केली मालगणी-वळती शेतरस्त्याची पाहणी
चिखली (Malgani-Valti Farm Road) : चिखली तालुक्यातील शेतरस्ते प्रकटीकरणाच्या अभियानाला वेग येत असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला मालगणी फाटा ते वळती हा शेतरस्ता अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दि. ६ मे २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. एवढी त्यांच्यासोबत माहित असेल ना मुरलीधर गायकवाड होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “हा (Malgani-Valti Farm Road) रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतीमाल वाहतूक सुलभ होऊन उत्पादन खर्चात बचत होईल तसेच उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील शेतीला आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीला या रस्त्यामुळे नवे बळ मिळेल.” अर्थसंकल्पीय रस्ते योजनेअंतर्गत मंजूर झालेला मालगणी फाटा ते वळती हा सुमारे २ किलोमीटर लांबीचा व अंदाजे २०० लाख रुपयांचा रस्ता सन २०२३-२४ मध्ये आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. मात्र, काही कास्तकारांच्या अडचणींमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मागील अडीच वर्षांपासून रखडलेला होता.
दरम्यान, या (Malgani-Valti Farm Road) समस्येबाबत गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदने सादर करून तोडगा काढण्याची मागणी केली होती. याची दखल घेत आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय सवडे यांच्या आदेशानुसार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी संबंधित कास्तकारांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याची आखणी केली. यावेळी सर्व संबंधित कास्तकारांचे समाधान करून मार्ग मोकळा करण्यात आला.
यानंतर लगेचच कामाला गती देत कंत्राटदाराने उपलब्ध केलेल्या पाच जेसीबीच्या साहाय्याने सर्वांच्या समक्ष कामास प्रारंभ करण्यात आला. या वेळी महसूल विभागाचे अधिकारी, अभियंते, कंत्राटदारांचे प्रतिनिधी तसेच मालगणी, पळसखेड जयंती आणि वळती या तिन्ही गावांतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एकूणच, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा शेतरस्ता आता प्रत्यक्षात साकार होत असून, यामुळे परिसरातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.