Chikhli Nagar Parishad: एकीकडे नगर परिषद नागरिकांवर करवाढ लादण्याचे मनसुबे आखत आहे, तर दुसरीकडे शहरातील मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
घाणीचे साम्राज्य, सांडपाण्याची समस्या कायम; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
चिखली (Chikhli Nagar Parishad) : चिखली नगर परिषदेने वाढविलेल्या कराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत करवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराचा निषेधही व्यक्त करण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे नगर परिषद नागरिकांवर करवाढ लादण्याचे मनसुबे आखत आहे, तर दुसरीकडे शहरातील मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांवरून सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Chikhli Nagar Parishad) नियमित साफसफाई, नाल्यांची स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच शहरात पाणीपुरवठ्याच्याही समस्या कायम असून नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नसताना करवाढ करणे अन्यायकारक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर घाणीचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरत असून साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. मात्र हे प्रकार थांबविण्यास नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख श्रीराम झोरे यांनी नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरणाऱ्या प्रशासनाने करवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. करवाढीचा निर्णय तातडीने रद्द न केल्यास शिवसेना व युवासेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना शहरप्रमुख आनंद गैची, समाधान जाधव,रवि पेटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बाजारपेठेतील घाण पाणी तात्काळ बंद करा: श्रीराम झोरे
चिखली शहरात (Chikhli Nagar Parishad) प्रत्येक सोमवार हा साप्ताहिक बाजाराचा दिवस असल्याने बाबू लॉज चौकाकडून नगर परिषद, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच न्यायालय परिसराकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र याच ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्यावर काही जनावरांच्या मटण विक्रेत्यांच्या दुकानांमधून घाण पाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची या परिसरात नेहमीच घाईगर्दी असते. रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्यातून वाहने वेगाने जात असल्याने हे घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. यामुळे अनेकदा नागरिक आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होतात. तसेच दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित मटण दुकानांमधून रस्त्यावर वाहणारे घाण पाणी तात्काळ बंद करून योग्य व्यवस्थापन करावे, तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख श्रीराम झोरे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.