Chikhli Heavy Rain: पहिल्याच पावसात शहरातील गल्लीबोळांपासून ते ग्रामीण भागातील शिवारांपर्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जणू काही रानं झाली आबादानी
चिखली (Chikhli Heavy Rain) : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते. मात्र मंगळवार, दि. 23 जून रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या दमदार पावसाने चिखली शहरासह संपूर्ण तालुक्याला मोठा दिलासा दिला. पहिल्याच पावसात शहरातील गल्लीबोळांपासून ते ग्रामीण भागातील शिवारांपर्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जणू काही "रानं झाली आबादानी" अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.
यावर्षीचा उन्हाळा विक्रमी तापला होता. विदर्भातील अनेक भागांसह बुलढाणा जिल्ह्यातही तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागला. पेरणीचा हंगाम सुरू होऊनही समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. 22 जून उलटून गेल्यानंतरही (Chikhli Heavy Rain) पावसाची जोरदार हजेरी न लागल्याने खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत 23 जून रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. चिखली शहरातील अनेक गल्लीबोळांमध्ये पावसाचे पाणी वाहताना दिसले, तर ग्रामीण भागातील शेतशिवारही ओलाव्याने तृप्त झाले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला वेग दिला आहे.
तालुक्यातील अंचरवाडी येथे (Chikhli Heavy Rain) पहिल्याच पावसात नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी-नाल्यांमध्ये पाणी वाहू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काही दिवसांत आणखी पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसाने निसर्गाला नवसंजीवनी दिली असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. पहिल्याच पावसात रानं झाली आबादानी, अशीच भावना नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.