केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर गणना’ (Houselisting) मोहिमेला चिखली तालुक्यात शुक्रवारपासून अधिकृत सुरुवात झाली आहे.
प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन
चिखली (Census India 2027) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर गणना’ (Houselisting) मोहिमेला चिखली तालुक्यात शुक्रवारपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. ही मोहीम १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या मोहिमेसाठी तालुक्यात एकूण ३८६ हाऊस लिस्टिंग ब्लॉक तयार करण्यात आले असून ३६४ प्रगणक व ६१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचारी तालुक्यातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यंदाच्या जनगणनेत पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मोबाईल ॲप आणि डिजिटल माध्यमांद्वारे माहिती संकलित केली जाणार असल्याने प्रक्रिया अधिक अचूक व सुरक्षित होणार आहे. तसेच नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरली आहे, त्यांनी प्रगणकांना आपला ‘SE ID’ देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तहसील प्रशासनाने नागरिकांना जनगणना कायदा १९४८ अंतर्गत अचूक माहिती देणे हे कायदेशीर कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली आहे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर कोणत्याही कर आकारणी किंवा चौकशीसाठी केला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच चुकीची माहिती देणे किंवा माहिती देण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
चार्ज अधिकारी (ग्रामीण) तथा तहसीलदार विजय सवडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “प्रगणक घरी आल्यास त्यांची ओळख पटवून त्यांना योग्य व संपूर्ण माहिती द्यावी. तसेच स्व-गणना केलेल्या नागरिकांनी आपला SE ID आवर्जून नोंदवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”