घाटमाथ्यावरील अत्यंत महत्त्वाचे आणि सतत वर्दळीचे केंद्र असलेल्या चिखली बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा निष्क्रिय; प्रवासी, महिला व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
चिखली (CCTV Security) : घाटमाथ्यावरील अत्यंत महत्त्वाचे आणि सतत वर्दळीचे केंद्र असलेल्या चिखली बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांचा “तिसरा डोळा” मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणाच निष्क्रिय झाल्यामुळे चोरटे, पाकीटमार, महिलांची छेडछाड करणारे आणि प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळ्यांचे धाडस वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
विदर्भ–मराठवाडा जोडणारा वरुड मार्ग, खामगाव–जालना हा महत्त्वाचा वाहतूक मार्ग तसेच चिखली–मलकापूर-सोलापूर राज्य महामार्ग या तिन्ही प्रमुख मार्गांवरील मोठा वाहतूक केंद्रबिंदू म्हणून चिखली बसस्थानक ओळखले जाते. तालुक्यासह परिसरातील हजारो प्रवासी दररोज या बसस्थानकावरून प्रवास करतात. याशिवाय प्रसिद्ध सैलानी दर्ग्यावर जाणारे भाविकदेखील याच मार्गाचा वापर करतात. बुलढाणा जिल्ह्यासह इतर राज्यांमधूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात.
मात्र एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाच बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. रात्री बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची तक्रार आहे. पाकीटमारी, महिलांचे दागिने चोरी, छेडछाड यांसारख्या घटना घडल्यास आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी अवघड ठरत आहे.
विशेष म्हणजे चिखली बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या तीनही प्रमुख मार्गांवर एकही सक्रिय कॅमेरा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगार घटना घडवून सहज पसार होत असल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने अनेक वेळा पोलिसांनाही तपासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत चिखली डेपो तसेच बुलढाणा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असता, संबंधित यंत्रणेचे नियंत्रण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून होत असल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे शासन आधुनिक तंत्रज्ञानाचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे हजारो प्रवासी व भाविकांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या बसस्थानकातील सुरक्षा यंत्रणाच बंद असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करून बसस्थानक परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.