मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा च्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक केले.
मुंबई (BJP Yuva Morcha) : मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा च्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार कौतुक करत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
“भाजप युवा मोर्चात काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. सध्या आपण सुवर्णकाळात आहोत आणि फडणवीस साहेबांसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे,” असे सांगत महाडिक यांनी फडणवीसांना आपले केवळ नेते आणि मार्गदर्शक नव्हे, तर “नालंदा विद्यापीठ” असल्याचे संबोधले. त्यांच्या सानिध्यात राहून आपण अनेक गोष्टी शिकत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे गेलो, तर कोणतीही नकारात्मक शक्ती मला रोखू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्रातील युवा मोर्चाला देशातील क्रमांक एक बनवणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही आभार मानले. “ही सभा युवकांची असली, तरी मनाने सर्वांत तरुण व्यक्ती इथे असतील तर ते रवींद्र चव्हाण आहेत. गेल्या काही काळात त्यांनी मला मुलासारखे जपले,” असे म्हणत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाडिक यांनी विरोधकांनाही इशारा देताना सांगितले की, “माझ्या तरुण वयातील प्रगती काहींना खटकत आहे. मात्र, माझा किती विरोध करायचा याचा त्यांनी विचार करावा. आगामी काळात मी माझ्या राजकीय शिखरावर असेन आणि भाजपचे प्रभावी शस्त्र ठरेन. तेव्हा माझ्यासमोर उभे राहण्याचे धाडस कोणालाही होणार नाही.”
यावेळी त्यांनी महाभारत मधील कुरुक्षेत्राच्या युद्धाचा दाखला देत आपली भूमिका स्पष्ट केली. “अर्जुनाने श्रीकृष्णाला सारथी म्हणून निवडले आणि त्याच मार्गदर्शनामुळे पांडवांना विजय मिळाला. त्याचप्रमाणे, मीही प्रत्येक कार्यकर्त्याच्या आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उभा राहण्यास तयार आहे. योग्य दिशा दाखवून प्रामाणिक मित्र म्हणून साथ देईन,” असे ते म्हणाले.