बीड जिल्ह्यातील परळी शहरात जुन्या वादातून आणि कथित राजकीय वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर 29 वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी शहरात जुन्या वादातून आणि कथित राजकीय वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर 29 वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लोखंडी रॉड आणि कोयत्याने करण्यात आलेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात फिर्यादीने तक्रारीत केलेल्या एका गंभीर आरोपामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अभिजीत नागेश कांबळे हा परळीतील भीमनगर येथील रहिवासी असून, तो चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील एका हॉटेलमध्ये चहा पित असताना काही जणांनी त्याला गाठले. त्यानंतर लोखंडी रॉड आणि कोयत्याने त्याच्यावर बेदम हल्ला करण्यात आला. या मारहाणीत त्याचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
फिर्यादीने आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, हल्ला सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून, "पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा... त्याचं मुंडक माझ्याकडे आणा," असा आदेश दिला. हा आरोप फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेप्रकरणी अभिजीत कांबळे यांच्या फिर्यादीवरून नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप तसेच इतरांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस करत आहेत.
अभिजीत नागेश कांबळे हा गेल्या तीन ते चार वर्षांपासून परळीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय असल्याचे सांगितले जाते. तर नितीन रोडे हे अजित पवार गटाचे नगरसेवक असून ते भीमनगरमधून निवडून आले आहेत. ते धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्याचे नमूद करण्यात आले असून, सोशल मीडियावर त्यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
याशिवाय, नितीन रोडे यांनी गेल्या काही वर्षांत राजकीय पाठबळाच्या जोरावर परळीत स्वतःची दहशत निर्माण केल्याची चर्चा असल्याचा उल्लेखही बातमीत करण्यात आला आहे. तसेच 'नितीन रोडे मित्रपरिवार' आणि 'डी कंपनी' या दोन गटांच्या माध्यमातून ते आपला कारभार चालवत असल्याचीही चर्चा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.