वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक तलाव, ओढे, नाले व विहिरी कोरड्या पडत असून पाण्यासाठी जनावरांची भटकंती वाढली आहे.
सेनगाव (Animal Welfare Service) : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील अनेक तलाव, ओढे, नाले व विहिरी कोरड्या पडत असून पाण्यासाठी जनावरांची भटकंती वाढली आहे. अशा कठीण परिस्थितीत सेनगाव तालुक्यातील मौजे कापडसिंगी येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा माजी सरपंच प्रकाशराव हराळ यांनी मागील तब्बल २५ वर्षांपासून मुक्या जनावरांसाठी सुरू ठेवलेली जलसेवा परिसरात आदर्श ठरत आहे.
कापडसिंगी गावालगतच्या मुख्य रस्त्यावरील स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी मोठा हौद बांधला असून त्या हौदात वर्षभर नियमित पाणी सोडले जाते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असतानाही स्वतःच्या खर्चातून कूपनलिका उभारून त्यांनी ही व्यवस्था कायम ठेवली आहे.
दररोज गावातील तसेच परिसरातील शेकडो जनावरे या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात. गुरेढोरे, बैल, गायी, म्हशी यांच्यासाठी हा हौद मोठा आधार ठरत असून जनावरांची तहान भागविण्याचे पुण्यकार्य हराळ कुटुंब सातत्याने करत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
फक्त जनावरांचाच विचार न करता प्रकाशराव हराळ यांनी नागरिकांसाठीही पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या ठिकाणी नळ व पाण्याची टाकी बसविण्यात आली असून प्रवासी, शेतकरी व नागरिकांनाही त्याचा लाभ होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी अनेक नागरिक तहान भागवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आजच्या काळात पाण्याचे महत्त्व वाढत असताना अनेक ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजहिताचा व मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते, “मुक्या जनावरांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. श्री हराळ यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद असून समाजाने अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
उन्हाळ्याच्या कडक तापमानात तहानलेल्या जनावरांना दिलासा देणारी ही जलसेवा कापडसिंगी परिसरात मानवतेचा झरा अखंड वाहत असल्याची भावना निर्माण करत आहे.