संपूर्ण रिसोड तालुक्यात तीव्र उन्हाच्या झळा आणि भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
रिसोड (Ajanta Pharma Initiative) : संपूर्ण रिसोड तालुक्यात तीव्र उन्हाच्या झळा आणि भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना, रिसोड शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे अजंता फार्मा मुंबई यांच्या वतीने शहरात बोरवेल खोदून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक भागांतील नागरिकांचा पाण्याचा गंभीर प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाला आहे.
सध्या रिसोड शहराला आठ ते दहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून, शहराबाहेरील नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्ये अद्याप नळपाईपलाईनची सुविधाही उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत रिसोडचे मूळ रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध उद्योगपती मन्नालालजी अग्रवाल यांनी पुढाकार घेत आपल्या अजंता फार्मामार्फत 35 बोरवेल खोदण्याचा निर्णय घेतला.
नगरपरिषदेच्या शिफारशी व जनतेच्या मागणीनुसार शहरातील माणिक नगर, गणेश मंदिर परिसर, शिवाजी वसाहत, बाळ समुद्र, अमरदास बाबा संस्थान, अनंत कॉलनी, महानंदा कॉलनी, सखाराम महाराज संस्थान लोणी, न्यायालय परिसर, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत, पिंगलाक्षी देवी परिसर, उत्तमचंद बगडिया महाविद्यालय आदी विविध ठिकाणी बोअर केले असून विशेष म्हणजे, या बहुतांश बोरवेलना भरपूर प्रमाणात पाणी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी 35 बोरवेल करण्याचा संकल्प मन्नालालजी यांचा आहे.
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी 1995-96 च्या भीषण दुष्काळातही अजंता फार्मातर्फे 40 बोरवेल खोदून रिसोडकरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अग्रवाल परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
मन्नालालजी अग्रवाल हे मूळचे रिसोडचे रहिवासी असून, आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून ते आरोग्य, शिक्षण, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी कार्य करत असतात. गरजू नागरिकांना वैद्यकीय व इतर वैयक्तिक मदत करण्याबरोबरच संकटकाळात धावून येणारे “संकटमोचक” म्हणून रिसोडकर त्यांच्याकडे आशेने पाहतात.
या उपक्रमामुळे पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शहरभरातून अजंता फार्मा व मन्नालालजी अग्रवाल यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.