महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या एका घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई विमानतळावर उड्डाणापूर्वीच बिघाड उघड; पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनाही प्रवासात उशीर
मुंबई (Aircraft Technical Glitch) महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या एका घटनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी त्या मुंबईहून रवाना होणार होत्या. मात्र, विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानात बिघाड आढळल्याने त्यांचा प्रवास काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यासाठी सीएमआर या खासगी कंपनीचे विमान आरक्षित केले होते. नियोजित वेळेनुसार त्या सायंकाळी ५ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. मात्र, उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत विमानात तांत्रिक दोष असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे उड्डाण तत्काळ थांबविण्यात आले.
या अनपेक्षित अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांना विमानतळावर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या सायंकाळी ७ वाजता दिल्लीकडे रवाना झाल्या. त्यामुळे त्यांच्या प्रवासाला सुमारे दोन तासांचा विलंब झाला.
या विमानातून सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल हे देखील दिल्लीतील एनडीए बैठकीसाठी जाणार होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे या सर्व नेत्यांनाही नियोजित वेळेपेक्षा उशिरा दिल्ली गाठावी लागली.
दरम्यान, या घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. बारामती दौऱ्यासाठी जात असताना त्यांचे विमान गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वी कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. संबंधित अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे.
अशा पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.