साहित्यिका सुमन दुबे को हिंगोली में महादेवी वर्मा

Writer Suman Dubey: हिंगोलीच्या साहित्यिका सुमन दुबे यांना ‘महादेवी वर्मा नॅशनल रायटर लिटरेरी ॲवॉर्ड’ जाहीर

हिंगोली (Writer Suman Dubey) : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बालरक्षक प्रतिष्ठान, इंदौर (मध्यप्रदेश) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे हिंगोली येथील सुप्रसिद्ध हिंदी गझलकार व साहित्यिका सुमन दुबे (Writer Suman Dubey) यांना ‘महादेवी वर्मा नॅशनल रायटर लिटरेरी ॲवॉर्ड’ (Mahadevi Verma National Writer Literary Award) जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सन्मान देण्यात येत आहे.

बालरक्षक प्रतिष्ठान ही संस्था देशभरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. मुलांची सुरक्षा, शिक्षणाचा प्रसार, शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच बालमजुरी व बालविवाह यांसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध जनजागृती करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहित्य या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक कार्यक्रम, वेबिनार आणि परिषदांचे आयोजनही संस्थेमार्फत केले जाते.

संस्थेचे अध्यक्ष मनोज चिंचोर असून सचिव म्हणून नरेश वाघ, धर्मेश जोशी, स्मिता राणा, मदनलाल, हरिदास शर्मा, रत्ना चौधरी, राघवेंद्र हेलीपेठ, स्पृहा इंदु, बी. यदु, अभय शर्मा, संजय मालवीय यांच्यासह अनेक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते संस्थेच्या कार्यात सक्रिय आहेत. “प्रत्येक मुलाला शिक्षण, सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्य मिळाले पाहिजे,” हे संस्थेचे ध्येय आहे.

सदर पुरस्काराचे वितरण १९ व २० मे २०२६ रोजी अहिल्या पॅलेस रिसॉर्ट, इंदौर येथे आयोजित नॅशनल एज्युकेशन कॉन्फरन्स व सन्मान समारंभात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार असून दहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

सौ. सुमन दुबे या हिंदी गझल आणि साहित्य क्षेत्रातील परिचित नाव असून त्यांच्या ‘देवत्व’, ‘द्विधारा’, ‘सत्रहवाँ शृंगार’, ‘बैरंग लिफाफे’, ‘बाय अधुरी है’ यांसारख्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाण, भावविश्व आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते.

या उल्लेखनीय यशाबद्दल मराठवाडा साहित्य परिषद शाखा, हिंगोली तसेच थवा प्रकाशन, हिंगोली यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक अर्धापूरकर, गोडाती काळे, गणेश येवले, रतन आडे, डॉ. राधिका देशमुख, पारिजात देशमुख, अश्विनी देशमुख, डॉ. गायत्री दरगु, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी कर्‍हाळे, महारूद्र घेणेकर, रघुनाथ घुगे, रघुवीर पतंगे, विजया पतंगे, रसीका विडोळकर, संगिता चौधरी, ज्ञानदा चौधरी, सविता देशमुख, विजय गुंडेकर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सौ. सुमन दुबे (Writer Suman Dubey) यांना मिळालेला हा (Mahadevi Verma National Writer Literary Award) राष्ट्रीय सन्मान हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या साहित्यिक कार्याला मिळालेली ही मोठी दखल असल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली.