पेणच्या गणेशमूर्ती उद्योगाला अतिवृष्टीचा मोठा फटका! ४३७ कारखाने बाधित, ५० हजार मूर्तींचे नुकसान
कोट्यवधींची हानी; गणेशोत्सव तोंडावर असताना मूर्तिकारांसमोर ऑर्डर पूर्ण करण्याचे आव्हान, ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम
गणेशोत्सवासाठी देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगावर यंदाच्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. अतिवृष्टीमुळे ४३७ गणेशमूर्ती कारखान्यांचे नुकसान झाले असून, सुमारे ५० हजार गणेशमूर्तींना फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकारांसमोर ग्राहकांच्या ऑर्डर वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पेणमधील गणेशमूर्तींना महाराष्ट्रासह देश-विदेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे येथील मूर्तिकार वर्षभर मेहनत घेऊन विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील गणेशमूर्ती तयार करतात. यंदाही उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मूर्तींची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे अनेक कारखान्यांमध्ये पाणी शिरल्याने वर्षभराची मेहनत काही क्षणांत वाया गेली.
पेण शहरासह जोहे, कळवे, शहापूर आणि तांबडशेत परिसरातील गणेश कला केंद्रांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. अनेक तयार मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, तर काही मूर्तींचे रंग खराब झाले. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या अनेक मूर्ती पाण्यात भिजून विरघळल्या. याशिवाय रंगकामासाठी लागणारे साहित्य, साचे, शाडूची माती, कच्चा माल आणि विविध उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानीमुळे केवळ मूर्तिकारांचेच नव्हे, तर या पारंपरिक उद्योगावर अवलंबून असलेल्या ५ हजारांहून अधिक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. आधीच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि बाजारातील स्पर्धेमुळे उद्योग अडचणीत असताना अतिवृष्टीने परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ४३७ कारखानदारांचे नुकसान झाले असून, प्रभावित मूर्तिकारांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. वेळेत भरपाई मिळाल्यास गणेशमूर्ती उद्योगाला पुन्हा उभारी मिळेल, अशी अपेक्षा कारखानदारांनी व्यक्त केली आहे.