सोलापूरमध्ये भीषण दुर्घटना : माळशिरसमध्ये विहिरीत पिकअप कोसळून १४ भाविकांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या रांजणी गावातील भाविकांवर काळाचा घाला; विहिरीला संरक्षणभिंत नसल्याची प्राथमिक माहिती
सोलापूर (Open Well Tragedy) : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या एका भीषण अपघातात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. तांदूळवाडी गावाजवळील एका शेतातील विहिरीत भाविकांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, विहिरीतून आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त पिकअपमधील सर्व प्रवासी हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. हे सर्वजण म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परतीच्या प्रवासादरम्यान तांदळवाडी परिसरात हा भीषण अपघात घडला.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या एका उघड्या विहिरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, वाहनातील अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ज्या विहिरीत वाहन पडले, त्या विहिरीभोवती कोणत्याही प्रकारचा कठडा किंवा संरक्षणभिंत नसल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले असून बचाव आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रांताधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून पिकअप टेम्पो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले की, अपघात त्यांच्या तालुक्यात घडला असून तांदळवाडी परिसरातील एका शेतात असलेल्या उघड्या विहिरीत हे वाहन कोसळले. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच माजी आमदार राम सातपुते यांनीही या दुर्घटनेला अत्यंत दुर्दैवी संबोधले. अपघातस्थळी असलेल्या विहिरीला कोणत्याही प्रकारची संरक्षक व्यवस्था नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, याआधी एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावाजवळ रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे एक कार विहिरीत कोसळली होती. त्या अपघातात दरगुडे कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाला होता.
इंदोरे गावचे रहिवासी सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले होते. परिणामी कार रस्त्याशेजारील खोल विहिरीत जाऊन पडली आणि एका कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर राज्यभरातील उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने उघड्या विहिरींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्यांच्या लगत असलेल्या विहिरींना संरक्षक कठडे आणि सुरक्षा भिंती उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.