लातूरमध्ये उद्या 'छात्रों की गूंज...विद्यार्थ्यांचा एल्गार कँडल मार्च'!
वंचितच्या 'लातूर बंद'ला काँग्रेसचा पाठिंबा
लातूर (Latur Students Protest) : देशातील वाढती हुकूमशाही, विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय आणि 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि. २३ जुलै) आयोजित करण्यात आलेला 'छात्रों की गूंज... विद्यार्थ्यांचा एल्गार कँडल मार्च' आजच्या लातूर बंदमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. आता हे जनआंदोलन उद्या, शुक्रवारी (दिनांक २४ जुलै) सायंकाळी ६ वाजता होईल, अशी माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या लातूर बंदला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी आजचा नियोजित 'कँडल मार्च' उद्या (२४ जुलै) काढण्यात येणार आहे. अभय साळुंके यांनी याबाबत माहिती देताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, देशात सध्या अराजकता माजली असून (Latur Students Protest) विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार सुरू आहेत. 'नीट' पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा; मात्र तसे न होता हे निर्दयी सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्य करत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने लक्ष्य केले गेले आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे आंदोलन ज्या दडपशाहीने मोडून काढण्याचा प्रयत्न झाला, तो लोकशाहीचा अपमान आहे. या हुकूमशाही, देशद्रोही आणि विद्यार्थीद्रोही सरकारचा आम्ही तीव्र धिक्कार करतो.
उद्या सायंकाळी ६ वाजता निघणार 'कँडल मार्च'
उद्या, २४ जुलै रोजी सायंकाळी ६:०० वाजता अष्टविनायक मंदिर (उद्योग भवन, ट्युशन एरिया) येथून सुरू होईल आणि हुतात्मा स्मारक (शहीद स्मारक, क्रीडा संकुल) येथे त्याचा समारोप होईल. या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भावनांना बळ देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख स्वतः सहभागी होऊन रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहितीही साळुंके यांनी दिली. नागरिकांना सहभागाचे आवाहन शिक्षणव्यवस्थेतील (Latur Students Protest) पेपरफुटी रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पुकारण्यात आलेल्या या जनआंदोलनात लातूर शहरातील सर्व विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांनी उद्या हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि एन.एस.यू.आय. च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.