'औसा बंद'; दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीमाराचे औशात तीव्र पडसाद
औसा (Ausa Bandh) : दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद गुरुवारी औसा शहरात उमटले. वंचित बहुजन आघाडी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने 'औसा बंद'ची हाक देत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच औशाचे तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करून संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. २०२६ च्या नीट (NEET) परीक्षेत कथित भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेक गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहावे लागल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी निवेदनावारे करण्यात आली.
दिल्लीतील जंतर-मंतर व संसद परिसरात 'नीट' घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या छात्र-छात्रांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे औशात संतापाची लाट पसरली आहे. गुरुवारी शहरातील व्यवहार बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणांचा धिक्कार करण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपवले. या (Ausa Bandh) आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सद्दाम अहमदपाशा पठाण, महासचिव सोहेल गौस शेख, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, किरण गायकवाड, इलियास चौधरी, राजेंद्र बनसोडे, अझहर अल्लाबख्श सिद्दीकी, सुरज राजेंद्र बनसोडे, महाविर बनसोडे, गंगाराम अडसुडे, चांद लोने, ताहेर कुरेशी, शफीक शेख, अखिल शेख, विशाल बनसोडे, वैभव लक्षण बनसोडे, महादेव वाघमारे, ओमप्रकाश लांडगे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.