आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीसाठ

आषाढी वारीत एसटीची विक्रमी कामगिरी; ९ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास, महामंडळाच्या तिजोरीत ४१.१८ कोटींची भर

५,५०० विशेष बस, २१,५२७ फेऱ्या आणि गतवर्षीपेक्षा ५.३० कोटी रुपयांनी अधिक उत्पन्न; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) केलेल्या विशेष वाहतूक व्यवस्थेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून चालविण्यात आलेल्या विशेष बससेवेच्या माध्यमातून ९ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी पंढरपूरचा प्रवास केला. या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी वारीसाठी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसह राज्यातील सर्व एसटी विभागांतून सुमारे ५,५०० विशेष बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रेच्या कालावधीत या बसांनी एकूण २१ हजार ५२७ फेऱ्या पूर्ण केल्या. या सेवेद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवास केला.

महामंडळाच्या माहितीनुसार, यंदाच्या आषाढी यात्रेतील विशेष वाहतुकीमुळे ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांनी अधिक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात. या भक्तिमय प्रवासात ‘लालपरी’ला सहभागी होण्याचे भाग्य दरवर्षी लाभते. भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुरक्षितपणे पंढरपूरपर्यंत पोहोचवणे आणि दर्शनानंतर सुखरूप घरी परत आणणे ही केवळ वाहतूक सेवा नसून विठ्ठलाची सेवा असल्याची भावना एसटी परिवाराच्या मनात आहे.’

आषाढी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर विशेष बससेवा उपलब्ध करून देत एसटी महामंडळाने लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरळीत पार पाडला. या उपक्रमामुळे भाविकांची सोय तर झालीच, शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाल्याचे यंदाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.