मेहुणाच निघाला अनमोलच्या हत्येचा मुख्य सुत्रधार
चौघांना अटक : अवघ्या १२ तासात उलगडा
गोंदिया (Anmol Murder Case) : फुलचूर येथील किसान चौकात काल (ता.२३) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात अनमोल रंगारी याचा मृतदेह आढळला. या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना गजाआड करण्यासाठी शोधचक्र फिरविले. दरम्यान अनमोल रंगारी याच्या पत्नीचा भाऊच हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले. ५० हजाराची सुपारी देवून तीन मित्राच्या मदतीने हत्या केल्याची बाबही उघडकीस आणली आहे. हे प्रकरण अवघ्या १२ तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. निरज तुलसीकुमार बनसोड (२८) रा.खुर्शिपारटोला आमगाव , रोहित ऊर्फ आयुष नहार बंशकार (१९), निशांत मंगल बंशकार (१९) व राहुल मिश्रा (३२) रा.नैनपूर (मप्र) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. सविस्तर असे की, भदुटोला येथील अनमोल वसंत रंगारी (४०) हा २२ जून रोजी रात्री ९ वाजता दुचाकीने घरून निघाला होता. मात्र तो घरी परतालाच नाही. २३ जून रोजी फुलचूर शिवारात त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याची हत्या करण्यात आल्याची बाबही समोर आली. त्या अनुसंगाने जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या सुचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि पुरूषोत्तम अहिरकर यांच्या नेतृत्वात तपासकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान अनमोल रंगारी याची पत्नी माहेरी राहत असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच अनमोलकडून बहिणीचा छळ होत असल्याची तक्रार मेहुण्याकडून करण्यात आली होती. त्या अनुसंगाने पोलिसांनी अनमोलचा मेहुणा निरज बन्सोड याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने बहिणीचा होत असलेला छळ आणि त्रासाला कंटाळून अनमोलचा काटा काढल्याचा कट रचला. त्यातूनच हत्या केल्याची कबूली दिली. यासाठी मध्यप्रदेश राज्यातील तीन मित्रांना ५० हजार रूपयाची सुपारी देवून त्याची हत्या केली, अशी कबूली दिली. यानुरूप मध्यप्रदेश राज्यातील नैनपूर येथील रोहित ऊर्फ आयुष नहार बंशकार, निशांत मंगल बंशकार व राहुल मिश्रा या तिघांना अटक करण्यात आली. सदर आरोपींना गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अवघ्या १२ तासात या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. हे यशस्वी तपासकार्य पोनि पुरूषोत्तम अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धिरज राजुरकर, सफौ राजु मिश्रा, भुवनलाल देशमुख, संजय चव्हाण, दिक्षीत दमाहे, विठ्ठल ठाकरे, सुबोध बिसेन, इंद्रजीत बिसेन, महेश मेहर, राकेश इंदुरकर, छगन विठ्ठले, राधेश्याम कावळे, राम खंडारे, रोशन येरणे, योगेश रहिले, श्रेय लांबट यांनी केली.