Emergency Services Abuse: १४ किमी अंतरावर एका वाहन

आपत्कालीन सेवेचा दुरुपयोग; खर्‍या गरजूंना धोका

Emergency Services Abuse

हिंगोली (Emergency Services Abuse) : डायल ११२ ही आपत्कालीन सेवा नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी आहे, पण सध्या किरकोळ कारणांसाठी तिचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री अशीच एक घटना घडली. पैनगंगा नदीच्या पुलाजवळ, वाशिम हायवेवर १४ किमी अंतरावर एका वाहनचालकाची गाडी पंक्चर झाली. त्यांनी थेट डायल ११२ वर कॉल करून 'लवकर मदत पाठवा, घटनेला ३० मिनिटे झाली' अशी मागणी केली. कॉल मिळताच कंट्रोल रूममधील टीम सतर्क झाली. अपघात किंवा जीवाला धोका असल्याच्या समजुतीने पोलिसांचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यावर दिसले की फक्त गाडीचे टायर पंक्चर होते. चालक स्वतः सुरक्षित होते, त्यांना कोणतीही दुखापत नव्हती. स्टेपनी बदलणे किंवा जवळच्या गॅरेजची मदत घेणे सहज शक्य होते. तरीही आपत्कालीन क्रमांकाचा वापर केला गेला.

डायल ११२ ही (Emergency Services Abuse) सेवा प्रामुख्याने अपघात, गुन्हे, महिला सुरक्षा, आग आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. एका पंक्चरच्या कॉलसाठी पोलिसांचे वाहन आणि मनुष्यबळ ३०-४० मिनिटे व्यस्त राहिले. याच वेळेत जर खरोखरच एखादा गंभीर अपघात झाला असता, किंवा कुणाच्या जीवाला धोका असता, तर मदत पोहोचायला उशीर झाला असता. पोलिस अधीक्षक कार्यालयाने यावर चिंता व्यक्त केली आहे. 'नागरिकांनी समजून घ्यावे की डायल ११२ हा 'सर्वसमावेशक हेल्पलाईन' नाही. गाडी बिघाड, पंक्चर, पेट्रोल संपणे यासाठी रोडसाईड असिस्टन्स, इन्शुरन्स कंपनी किंवा स्थानिक मेकॅनिकची मदत घ्यावी. उगाचच ११२ वर कॉल करून यंत्रणेवर ताण वाढवू नये,' असे आवाहन करण्यात आले आहे. 

जबाबदार नागरिक व्हा तज्ज्ञांच्या मते, युरोप-अमेरिकेत ९११ किंवा ११२ चा खोटा/ किरकोळ कॉल करणे हा दंडनीय अपराध आहे. भारतातही नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. तुमचा एक चुकीचा कॉल कुणाचा तरी जीव धोक्यात घालू शकतो. आपत्कालीन सेवा ही 'सुविधा' नसून 'जीवनरक्षक' आहे. तिचा सन्मान राखूया. किरकोळ कामांसाठी योग्य पर्याय निवडा आणि खर्‍या गरजूंसाठी ११२ मोकळी ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.