लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया; अद्यापही 25 टक्के क्षेत्र नापेर! आतापर्यंत केवळ 51 टक्के पाऊस!
महादेव कुंभार लातूर (Latur Drought-affected) : जुलै महिना सरत आला तरीही लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. लातूर जिल्ह्यात यंदा आज अखेर केवळ 51 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यात 25 टक्के क्षेत्र अद्यापही नापेर आहे. या भागात पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा आहे. लातूर जिल्ह्यात (Latur Drought-affected) यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने हुलकावणी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 51 टक्के पाऊस झाला असून पेरणी 75 टक्के झाली आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे. जून महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यात सरासरी 70 टक्के पाऊस झाला. अपेक्षेच्या 70 टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागात खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. कृषी विभागाने शंभर टक्के पाऊस झाले शिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन केल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. जून महिन्यात चाकूर तालुक्यात केवळ 40 टक्के औसा व देवणी तालुक्यात 56 टक्के तर निलंगा व लातूर तालुक्यात प्रत्येकी 68 टक्के इतका पाऊस झाला. या महिन्यात जळकोट तालुक्यात 207 शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 106 तर रेणापूर तालुक्यात 104 टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यामध्ये आज अखेर सरासरी अपेक्षेच्या केवळ 36 टक्के पाऊस झाला आहे. त्यात शिरूर अनंतपाळ तालुका केवळ 25 टक्के, चाकूर 29 टक्के, तर लातूर व रेणापूर तालुक्यात केवळ 34 टक्के पाऊस झाला आहे. या महिन्यात सर्वाधिक पाऊस औसा तालुक्यात 50 टक्के निलंगा तालुक्यात 44, तर उदगीर तालुक्यात 40 टक्के नोंदला गेला आहे. खरीप पेरणीचे दिवस सरत आले आहेत. 31 जुलै हा पेरणीचा शेवटचा दिवस मानला जातो. मात्र आज अखेर जिल्ह्यामध्ये केवळ 75 टक्के पेरणी झाल्याची नोंद सरकार दरबारी झाली आहे. त्यात जळकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 99 रेणापूर तालुक्यात 90 अहमदपूर तालुक्यात 86 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वात कमी म्हणजे 47 टक्के शिरूर अनंतपाळ तालुक्यात, चाकूर तालुक्यातील 61 तर लातूर तालुक्यात 68 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चाऱ्याची टंचाई भासू लागली! जून व जुलै हे पावसाळ्याचे महत्त्वाचे दोन महिने आहेत. या दिवसात चांगला पाऊस झाला तर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता होते. मात्र या दोन्ही महिन्यात सरासरीच्या 50 टक्के पाऊस झाल्याने अद्यापही चारा उपलब्ध झाला नाही. गतवर्षीच्या हंगामातील साठवणूक केलेला चारा संपून गेला आहे. त्यामुळे यापुढे पशुधनाला चारा कोठून उपलब्ध करायचा? असा मोठा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक यांना पडला आहे. सरकारने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.