पीकविम्याकरिता दहा दिवसांची मुदतवाढ
हिंगोली जिल्ह्यात ३१ जुलै अखेर १ लाख ९७ हजार ६४२ अर्ज दाखल
हिंगोली (Crop Insurance Scheme) : खरीप हंगामातील पिकविमा काढण्याची मुदत शुक्रवारी ३१ जुलै रोजी संपुष्टात आली आहे. परंतु निर्धारित कालावधीत १ लाख ९७ हजार ६४२ शेतकर्यांनी एक लाख २५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. दरम्यान, शासनाने पिकविमा काढण्यासाठी १० ऑगस्ट सोमवार पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढमुळे शेतकर्यांना फायदा होणार आहे. सातत्याने बदलत्या वातावरणामुळे दरवर्षी खरीप हंगाम धोक्यात येत आहे. शेतकर्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकर्यांनी १५,१८४ हून अधिक अर्ज दाखल करत ९,१२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी ५१ कोटी ७१ लाख रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते तर मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, सुधारित पीकविमा योजना जाहीर करून केवळ उत्पादकतेवर आधारित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे गतवर्षी अधिक उत्पादन झाल्याचे कारण देऊन जिल्ह्याला शेतकर्यांचा विमा नाकारण्यातआला होता. परिणामी, यंदा शेतकर्यांमध्ये पीकविमा काढण्यास निरुत्साह दिसून आला. सुरवातीला मोजक्याच शेतकर्यांनी पीकविमा काढला. मध्यंतरी बदललेल्या वातावरणामुळे विमा काढण्याकडे शेतकरी वळले. शेवटच्या दिवसांपर्यंत १ लाख ७० हजार २९० शेतकर्यांनी १ लाख ९७ हजार ६४२ अर्ज दाखल केले असून, १ लाख २५ हजार ७२० हेक्टर क्षेत्रासाठी ७७६ कोटी ६४ लाख रुपयांचे संरक्षण घेण्यात आले आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांनी पीकविमा काढला नाही. शेवटी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दहा ऑगस्ट पर्यंत शेतकर्यांना पीकविमा काढता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. आता किती शेतकरी विमा काढतील ही वेळच सांगेल.