गावोगाव जोडणारा महामार्ग; 13 जिल्ह्यांचा विकासाचा नवा मार्ग
(Rural Connectivity) राज्य सरकारने बहुप्रतिक्षित शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला अखेर मंजुरी देत प्रकल्पाला गती देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. सुमारे 856.76 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग दिग्रज (जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा उभारण्यात येणार असून, 13 जिल्हे आणि 40 तालुके या मार्गाशी जोडले जाणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक गावांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. यामध्ये विविध नद्यांवर पूल उभारणे तसेच डोंगराळ भागात सुरक्षित घाटमार्ग विकसित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या मूळ आराखड्याला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील बागायती शेतीवर परिणाम होणार असल्याने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने आराखड्यात बदल करत सुधारित योजना सादर केली. परिणामी सातारा जिल्हाही या महामार्गाच्या कक्षेत समाविष्ट झाला असून, आतापर्यंत मुख्य प्रवाहापासून दूर असलेली अनेक गावे या मार्गामुळे जोडली जाणार आहेत.
सुधारित योजनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 73, सांगलीतील 25, साताऱ्यातील 16 आणि सोलापूरमधील 35 गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत होणार असून, वाहतूक सुलभतेत लक्षणीय सुधारणा होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील अनेक गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत समाविष्ट गावांची यादी पुढीलप्रमाणे आहे —
हातकणंगले तालुका : जुने पारगाव, नवे पारगाव पन्हाळा तालुका : वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे करवीर तालुका : केर्ली केलें (रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला राधानगरी तालुका : राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे कागल तालुका : बोरवडे, उंदरवाडी भुदरगड तालुका : नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली आजरा तालुका : हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी चंदगड तालुका : बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर
या सर्व गावांना महामार्गामुळे थेट जोडणी मिळाल्याने स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, शक्तिपीठ महामार्गामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी विकासाच्या नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. उद्योग, पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायांना गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी वाढतील. प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक अधिक सुलभ होईल. परिणामी, हा महामार्ग राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मानले जात आहे.