बारुईपूर रेप-मर्डर केस: १२ वर्षीय मुलीच्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार
क्राईम सीनची पुनर्रचना करताना आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून पळण्याचा प्रयत्न; १२ वर्षीय मुलीच्या अत्याचार-हत्येनंतर राज्यभर संताप
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बारुईपूर येथे १२ वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या गाजत असलेल्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक प्रवास मंडल याचा मंगळवारी मध्यरात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. गुन्ह्याची पुनर्रचना करण्यासाठी नेत असताना आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून पळण्याचा प्रयत्न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास प्रवास मंडल याला घटनास्थळी नेण्यात येत होते. यावेळी त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याचे शस्त्र हिसकावून घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बारुईपूरमध्ये घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. १२ वर्षीय मुलगी वाढदिवसासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यानंतर बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला होता.
या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत बारुईपूर-जयनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी प्रशासनाने सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे मुख्य आरोपी आनंद सरदार याचा शोध घेत सोमवारी त्याला अटक केली. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रारंभी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला नव्हता. नंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवालात अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदार सायोनी घोष यांनी मंगळवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. अशा गुन्ह्यांचा विचार करणाऱ्यांमध्येही भीती निर्माण होईल, अशी शिक्षा न्यायालयाने द्यावी, असे त्यांनी म्हटले.
राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनीही या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा, अगदी मृत्युदंड मिळावा यासाठी राज्य प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले. पीडित कुटुंबाच्या इच्छेनुसार शासन कार्यवाही करेल आणि आरोपींना लवकरात लवकर दोषी ठरवून फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.