पानकनेरगावात वाईन बारविरोधात महिलांचा एल्गार
गुप्त मतदानातून दारूबंदीची मागणी; चार वाईन बारचे परवाने रद्द करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा प्रशासनाला निवेदन
पानकनेरगाव (Wine Bar Protest) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे वाईन बारच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महिला वर्ग व ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात दारूबंदी लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. गावातील वाढत्या दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत महिलांनी व ग्रामस्थांनी वाईन बारविरोधात तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
शासनाच्या नियमानुसार ‘गुप्त मतदान’ प्रक्रिया राबवून गावातील चारही वाईन बारचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात पानकनेरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे ६०० महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले. तसेच महिला ग्रामसभेत २ मे रोजी ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार, बीडीओ आणि सेनगाव पोलिस ठाण्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पानकनेरगाव हे धार्मिक, सुसंस्कृत आणि शांत गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, काही वाईन बार चालकांच्या मनमानीमुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. शासनमान्य परवाना केवळ दुकानातून विक्रीसाठी असताना काही बार चालकांकडून दुचाकीवरून ‘होम डिलिव्हरी’द्वारे दारू पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे गावातील गल्लीबोळात सहज दारू पोहोचत असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच सकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आणि सुट्टीच्या दिवशीही चोरट्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ ते २० वयोगटातील युवकांना सर्रास दारू विकली जात असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे.
काही ठिकाणी मद्यधुंद व्यक्तींकडून शिवीगाळ व भांडणांचे प्रकार घडत असल्याने महिला आणि शाळकरी मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
गावातील सर्व वाईन बारचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत तसेच शासन निर्णयानुसार विशेष सभा घेऊन गुप्त मतदान प्रक्रिया राबवून गावात दारूबंदी लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे पानकनेरगावात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. लवकर न्याय न मिळाल्यास महिला वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.