कोरची तालुक्यातील अतिदुर्गम व जंगल परिसर म्हणून ओळ

बोटेकसा गावात भीषण पाणीटंचाई; नागरिकांचा संताप, आमदारांवर निष्क्रियतेचा आरोप

Water Scarcity

कोरची (Water Scarcity) : कोरची तालुक्यातील अतिदुर्गम व जंगल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहीटेकला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोटेकसा गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज वनवाटांनी भटकंती करावी लागत असून महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे गावातील विहिरी व इतर जलस्त्रोत आटण्याच्या स्थितीत आले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

गावकऱ्यांनी यापूर्वी आमदार रामदास मसराम यांना निवेदन देऊन पाण्याची तात्काळ सोय करून देण्याची मागणी केली होती. मात्र, या समस्येवर कोणताही ठोस पाठपुरावा करण्यात आला नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आमदारांबद्दल निष्क्रियतेची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

​​​​​​​

दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत गावात लाखो रुपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. तसेच प्राधिकरणामार्फत विहीर खोलीकरणाची कामेही करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात नळांना एकदाही पाणी आले नसल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही मूलभूत पाण्याचा प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या परिस्थिती इतकी बिकट आहे की महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक मीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी बंद पडलेल्या नळ योजनेची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी तसेच पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण हटविणे आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची उपाययोजना राबवावी, अशी मागणी केली आहे. “पाणी हा आमचा मूलभूत हक्क असून आदिवासीबहुल गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या संदर्भात महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रभावती भारतसागर, जयवंताबाई मडावी, सिंधुताई नागपुरे, सविता चंदनखेडे, अनिता बेलवाती, अग्नीबाई भैसाछान, तिजन जेठुमल, किर्तनबाई अडभैया, लता भैसाछान, झामीन अडभैया, सुरेखा जेठुमल, लोमीन जेठुमल, यशोदा अडभैया, तालेश्वरी नरोटे, रानु बिलोरी, राजकुमारी भैसाछान, खेमेश्वरी अडभैया, लाजवंती नेटी, कुंतीबाई, खिलेश्वरी अडभैया, जनाबाई, प्रमिलाबाई, श्यामला काटेंगे, असारोबाई कुमरे, सुशीला कुमरे, रेगुन गुरूपंच, महेश्वरी सेंदकपाट, रवीता भैसाछान तसेच गावातील सर्व महिला व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.