हिंगोली तालुक्यातील खेर्डा गावाजवळील धोतरा शिवारात

धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा विहिरीत पडून मृत्यू

Water Scarcity

खेर्डा (Water Scarcity) : हिंगोली तालुक्यातील खेर्डा गावाजवळील धोतरा शिवारात पाण्याच्या शोधार्थ आलेल्या रोहीचा शनिवार, १६ मे रोजी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वनविभागाचे कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

हिंगोली तालुक्यातील धोतरा परिसरात शेतशिवारातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून नदी-नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील माळरान क्षेत्रात राहणारे वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करत आहेत. अशाच एका कळपापासून वेगळा पडलेला रोही पाण्याच्या शोधार्थ धोत्रा परिसरात आला होता.

शेतशिवारात पाणी न मिळाल्याने रोहीने गावाकडे धाव घेतली. गावाजवळ जुगल मुंदडा यांच्या विहिरीमध्ये तो पडला. याची माहिती मिळताच मुंदडा यांनी माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांना कळवले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली.

वनरक्षक उबाळे व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण तसेच गावकरी ज्ञानेश्वर उल्हास चव्हाण, निर्गुण चव्हाण, पप्पू चव्हाण, गजानन शेळके, जीजुबा चव्हाण यांच्या मदतीने विहिरीत पडलेला रोही बाहेर काढण्यात आला.

दरम्यान, धोतरा परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यामध्ये वनविभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.