मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर व दीड वर्षाच्या मुलासह उडी; रत्नागिरीत महिला मृत, पिता-पुत्र गंभीर
खेड तालुक्यातील मेटे गावाजवळील घटना; सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाचा संशय, पोलिसांचा सखोल तपास सुरू
रत्नागिरी (Train Jump) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मडगावहून मुंबईकडे धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची घटना मेटे गावाजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पिता आणि मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.
या दुर्घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर (वय अंदाजे) यांचा रेल्वे ट्रॅकवर पडून जागीच मृत्यू झाला. तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांवरही उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसात आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेतून उडी घेतल्यामुळे तिघेही लोहमार्गालगत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना तत्काळ कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असून सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत.
धावत्या रेल्वेतून, त्यातही लहान मुलाला सोबत घेऊन इतका टोकाचा निर्णय का घेण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी किंवा मानसिक तणाव यापैकी कोणते कारण या घटनेमागे होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, उडी घेण्यापूर्वी ट्रेनमध्ये त्यांच्यात काही वाद झाला होता का, याबाबतही सहप्रवाशांचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ तसेच रुग्णालयात भेट दिली. प्राथमिक माहितीनुसार हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक पुरावे, नातेवाईकांची चौकशी आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे खेड पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.