प्रत्येक गावात थ्री फेज केबल वायरने विद्युत जोडणीची मागणी
कोरची (Three Phase Connection) : कोरची तालुका मुख्यालयापासून ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटगुल परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या कायम होती. ढोलडोंगरी येथे ३३ केव्ही विद्युत सब सेंटर सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात ही समस्या कमी झाली असली, तरी कोटगुल परिसरातील काही गावांमध्ये अजूनही विद्युत समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ही समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी यांच्याकडे ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे मागणी मांडण्यात आली. प्रत्येक गावात केबल वायरने थ्री फेज विद्युत जोडणी करण्यात यावी, जेणेकरून कमी दाबाची समस्या निर्माण होणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी क्षेत्रातील विद्युत समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ३३ केव्ही सब सेंटरच्या देखरेखीसाठी कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.
तसेच पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या ब्रेकडाउन टाळण्यासाठी ट्री कटिंग करणे, तसेच कोरची व धानोरा तालुक्यात नियमित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेनंतर अधीक्षक अभियंत्यांनी मुरूमगाव येथे नियुक्त अभियंत्यांना संबंधित समस्या सोडवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, संबंधित अभियंत्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी पंधरा दिवसांत गोटाटोला, पाटीलटोला व परिसरातील काही गावांमध्ये केबल वायरद्वारे थ्री फेज विद्युत जोडणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, ईश्वर कोरेटी, नारद फुलारे, चिंताराम सोनफूल, अविनाश हारामी, रामलाल मुलेटी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.