तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर रस्त्याची दयनीय अवस्था
काम सुरू न झाल्यास १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
चिखली (Chikhli Farmers Andolan) : चिखली तालुक्यातील रोहडा व आंत्रिखेडेकर परिसरातील नागरिकांनी तपोवन देवी ते आंत्रिखेडेकर तसेच रोहडा ते आंत्रिखेडेकर या महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्ती व कामासाठी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास १ जून २०२६ पासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या मागणीसंदर्भात ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रोहडा ते आंत्रिखेडेकर हा (Chikhli Farmers Andolan) रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व पाण्यामुळे हा मार्ग धोकादायक बनतो. शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आंत्रिखेडेकर ते तपोवन देवी गावजोड रस्ता मंजूर असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून यावर्षी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे बटणिकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र अद्यापही काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या (Chikhli Farmers Andolan) परिसरातील नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती व दुग्ध व्यवसाय आहे. बारमाही मजबूत रस्ता तयार झाल्यास शेतीमाल वाहतूक, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, भाजीपाला उत्पादन तसेच फळबाग विकासाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सतत निवेदने देऊन व पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. संबंधित कामास त्वरित सुरुवात न झाल्यास १ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी राहुल टाकळकर, संजय खेडेकर, समाधान खेडेकर, नारायण चित्राने, राजेंद्र बोरकूल, विनायक खेडेकर, जयराम खेडेकर, समाधान पेंढारकर, सुभाष खेडेकर, अमोल मोरे, जयनारायण खेडेकर, गणेश पर्राड, अण्णा माळेकर, उत्तम माळेकर, नारायण खेडेकर, दगडू खेडेकर, शांताराम मोरे, रतन बभ्रूले, भीमराव तळेकर, शांतिलाल खरात, प्रताप खरात, मधुकर शेळके, सागर खरात आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.