रस्ता कामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण
रोहडा–अंत्रीखेडेकर मार्गाच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाविरोधात संताप
चिखली (Fasting to death) : रोहडा ते आंत्रीखेडेकर तसेच तपोवन देवी ते आंत्रीखेडेकर या रस्त्यांच्या दुरुस्ती व बांधकामाच्या मागणीसाठी रोहडा व अंत्रीखेडेकर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी चिखली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार निवेदने देऊनही संबंधित रस्त्यांच्या कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रोहडा ते आंत्रीखेडेकर हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या मार्गाची अवस्था आणखी बिकट होत असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. आंत्रीखेडेकर ते तपोवन देवी गावजोड रस्त्याला मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत २० मे रोजी तहसीलदारांकडे निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने १ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. अखेर कामास सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या भागातील नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती व दुग्ध व्यवसाय असून चांगला रस्ता झाल्यास शेतीमालाची वाहतूक, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच भाजीपाला व फळबाग विकासाला चालना मिळेल, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणात राहुल टाकळकर, संजय खेडेकर, समाधान खेडेकर, नारायण चित्राणे, राजेंद्र बोरकूल, विनायक खेडेकर, जयराम खेडेकर, समाधान पेंढारकर, सुभाष खेडेकर, अमोल मोरे, जयनारायण खेडेकर, गणेश पर्राड, अण्णा माळेकर, उत्तम माळेकर, नारायण खेडेकर, दगडू खेडेकर, शांताराम मोरे, रतन बभ्रुळे, भीमराव तळेकर, शांतिलाल खरात, प्रताप खरात, मधुकर शेळके, सागर खरात यांच्यासह अनेक शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ शिवसेना नेते कपिल खेडेकर , संतोष भुतेकर,शेतकरी नेते विनायक सरनाईक, समाधान कणखर, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते शिवाजी पवार प्रदीप वाघ आदींनी भेटी देऊन आंदोलनात पाठिंबा दिला आहे.