महाराष्ट्रात दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराज

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणः सुनेत्रा पवार यांच्या भावासह आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

Pawanraje Nimbalkar Murder Case

मुंबई (Pawanraje Nimbalkar Murder Case) : महाराष्ट्रात दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल अखेर शनिवारी मुंबईतील विशेष CBI न्यायालयाने जाहीर केला. ३ जून २००६ रोजी झालेल्या या दुहेरी हत्याकांडात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल २० वर्षे सुरू असलेल्या या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

या प्रकरणात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची ३ जून २००६ रोजी कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास कळंबोली पोलिसांनी केला. त्यानंतर प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण १२७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि अनेक राजकीय तसेच गुन्हेगारी पैलूंवर न्यायालयात सुनावणी झाली.

निकालाच्या दिवशी प्रमुख आरोपी पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवर न्यायालयात उपस्थित होते. याआधीच्या सुनावणीवेळी प्रकृतीच्या कारणास्तव ते आणि आणखी एक आरोपी गैरहजर राहिले होते. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मागील सुनावणीनंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

विशेष CBI न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालाचे वाचन करताना एका लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे नमूद केले. या प्रकरणाचा प्रारंभीचा तपास कळंबोली पोलिसांनी, तर त्यानंतर CBI ने सखोल तपास केल्याचे त्यांनी सांगितले. खटल्याच्या प्रवासात अनेक सरकारी वकील बदलले आणि दीर्घ न्यायप्रक्रियेनंतर हा निकाल देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने नमूद केले की, पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेद आणि वैमनस्य होते. साखर कारखान्यांशी संबंधित वाद, विविध तक्रारी आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे दोघांमध्ये संघर्ष असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. मात्र, केवळ राजकीय वैमनस्य सिद्ध होणे हे दोषी ठरविण्यासाठी पुरेसे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, पवनराजे निंबाळकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची कोणतीही औपचारिक तक्रार नोंदविलेली नव्हती. त्यामुळे त्या दृष्टीने थेट पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

माफीच्या साक्षीदारावर न्यायालयाची शंका

या खटल्याचा मोठा आधार आरोपी क्रमांक ४ पारसमल जैन यांच्या माफीच्या साक्षीदार म्हणून दिलेल्या जबाबावर होता. मात्र, न्यायालयाने त्यांच्या साक्षीच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, पारसमल जैन यांच्यावर क्राइम ब्रँचने चोरीचे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस कोठडीत ठेवले होते. त्या काळात त्यांच्यावर मारहाण झाल्याचा तसेच त्यांची औषधे बंद करण्यात आल्याचा दावा समोर आला. त्यानंतर त्यांनी दिलेला कबुलीजबाब आणि माफीचा साक्षीदार म्हणून केलेली साक्ष संशयास्पद असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

माफीच्या साक्षीदाराचा जबाबच या खटल्याचा प्रमुख आधार असल्याने तो विश्वासार्ह न ठरल्यामुळे संपूर्ण खटल्याचा पाया कमकुवत झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच केवळ माफीच्या साक्षीदारावर नव्हे, तर उपलब्ध सर्व साक्षीपुरावे आणि कागदपत्रांचा विचार करूनच हा निर्णय देण्यात आल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया

निकालानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. गेल्या २० वर्षांपासून या निकालाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगताना त्यांनी न्यायालयाचा निर्णय उपलब्ध साक्षीपुराव्यांच्या आधारेच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

निकालाचा आणि पक्षांतराच्या चर्चेचा संबंध जोडला जात असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावत, तसे असते तर आपण २०२२ मध्येच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.