हातावरील मेहंदीही न सुकता संपलं आयुष्य; जळगावात भरधाव कारच्या धडकेत वैशाली पाटील ठार
माहेरी जाताना विद्यापीठासमोरील रस्त्यावर अपघात; काका गंभीर जखमी, अपघातग्रस्त वाहनाचा पोलिसांकडून शोध
जळगाव : लग्नाच्या आनंदाला अवघे सहा दिवस उलटले असतानाच एका भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या २१ वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा सोमवारी (१३ जुलै) जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
वैशाली भाऊसाहेब पाटील या अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्याने देवदर्शनाचाही कार्यक्रम पूर्ण केला होता.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच माहेर आणि सासरच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. काही दिवसांपूर्वी विवाहसोहळ्याच्या आनंदाने गजबजलेल्या दोन्ही कुटुंबांवर या घटनेनंतर शोककळा पसरली. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, अपघात घडविणाऱ्या चारचाकी चालकाला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, याच दिवशी ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाल्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या मोठ्या अपघाताने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.