Adv. Sahebrao More: देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या

NEET' पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार प्रहार

Adv. Sahebrao More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची समाजसेवक ॲड. साहेबराव मोरे यांची मागणी

मलकापूर (Adv. Sahebrao More) : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट (NEET) व इतर स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून प्रसिद्ध समाजसेवक ॲड. साहेबराव मोरे (Adv. Sahebrao More) (मलकापूर) यांनी केंद्र सरकारवर अत्यंत उग्र शब्दांत टीका केली आहे. "लोकशाही, संविधान आणि देशाच्या भविष्यापेक्षा कोणताही शिक्षणमंत्री किंवा सत्ता मोठी असू शकत नाही," असा घणाघाती आरोप करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी तातडीने राजीनामा द्यावा अथवा सरकारने त्यांची हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

विद्यार्थी आणि आंदोलकांवरील कारवाईवरून तीव्र संताप

ॲड. साहेबराव मोरे (Adv. Sahebrao More) यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना सांगितले की, "परीक्षांमधील घोटाळे उघडकीस आल्याचे सरकारने कबूल करूनही जबाबदार घटकांवर कठोर कारवाई होण्याऐवजी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज केला जात असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत." तसेच, लडाखच्या संरक्षणासाठी व लोकशाही हक्कासाठी गेल्या २२ दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, "सरकार आंदोलकांच्या आणि जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करत आहे," असा आरोप त्यांनी केला.

संसदेतील गोंधळ आणि लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह

"विरोधी पक्षातील प्रमुख नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी संसदेत सरकारला धारेवर धरले आहे. देशातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनता या सरकारच्या धोरणांमुळे संतप्त झाली आहे. राममंदिराच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून सत्ता मिळवणाऱ्या या सरकारने आता जनतेचा विश्वास गमावला आहे," असे ॲड. मोरे (Adv. Sahebrao More) यांनी म्हटले.

कायद्याचे राज्य की सत्तेचा माज?

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि लोकशाही मूल्यांचा संकोच केला जात असल्याचे सांगत ॲड. साहेबराव मोरे (Adv. Sahebrao More) म्हणाले की, "जर शिक्षणमंत्री राजीनामा देण्यास तयार नसतील, तर हा सत्तेचा अहंकार आहे. जनता आता शांत बसणार नाही. सरकारने वेळेत योग्य पावले उचलून परीक्षांमधील पारदर्शकता सिद्ध करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल," असा इशाराही त्यांनी या बातमीच्या माध्यमातून दिला आहे.