दिल्लीतील NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ

NEET आंदोलनावर राज-उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद; 26 जुलैला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक विद्यार्थ्यांसोबत मोर्चा

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद, केंद्र सरकारच्या भूमिकेवर सवाल

मुंबई : दिल्लीतील NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांसह मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलन सुरुवातीपासून शांततापूर्ण असल्याचा दावा केला. मात्र, आंदोलकांवर केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले. या घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. सत्तेत नसताना भाजपने अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली होती, तर काँग्रेसच्या काळात अशा मागण्या मान्य झाल्याची उदाहरणे त्यांनी दिली. कसाब प्रकरणातील वक्तव्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामाही घेण्यात आला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

NEET परीक्षा पेपरफुटी ही पहिल्यांदाच घडलेली घटना नसून ही तिसरी वेळ असल्याचा दावा करत राज ठाकरे म्हणाले की, NEET परीक्षा प्रणाली सुरू करण्यात आली तेव्हापासूनच आम्ही तिचा विरोध केला होता. सुरुवातीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, मात्र आता हा मुद्दा थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्वीट केले असले तरी त्यांनी आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधायला हवा होता. तसे झाले असते तर आंदोलन इतके चिघळले नसते, असेही त्यांनी म्हटले.

शेतकरी आंदोलन, शीख आंदोलन आणि मणिपूरमधील परिस्थितीचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकार संवाद टाळत असल्याचा आरोप केला. "हा सत्तेचा माज कशासाठी? कोणाचंच ऐकायचं नाही, ही कोणती कार्यपद्धती?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत आपण शेतकऱ्यांनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची भीती व्यक्त केली होती, असे सांगत त्यांनी सध्याच्या घटनांमुळे प्रत्येक कुटुंब चिंतेत असल्याचे नमूद केले.

26 जुलै रोजी मुंबईत विद्यार्थ्यांसह शक्तिप्रदर्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, हा मोर्चा रविवारी सकाळी 11.30 वाजता शिवतीर्थ येथून सुरू होऊन सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, हा विषय आता केवळ NEET परीक्षेपुरता मर्यादित राहिलेला नाही. बिहारमधून आलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तीने संजय राऊत यांची भेट घेऊन गेल्या काही वर्षांपासूनचा रोष व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींवर लाठीमार झाल्याचे, त्यांना मारहाण झाल्याचे आणि कपडे फाडल्याचे गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केले. न्यायव्यवस्थेवरही त्यांनी भाष्य करत, या प्रकरणाकडे आवश्यक गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची टीका केली. पंतप्रधानांनी केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करायला हवी होती, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमधील व्यक्तींच्या हातात पोलिसांच्या काठ्या कशा आल्या, असा सवाल उपस्थित केला. आंदोलन मोडून काढण्यासाठी अशा प्रकारे गुंडांचा वापर करण्यात आला का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराविरोधात प्रत्येकाने आवाज उठवण्याचे आवाहन करत, 26 जुलैच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषदेतून केले.