आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये

हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार; आमदार राजू नवघरे यांचा निर्धार

NCP Hingoli

हिंगोली (NCP Hingoli) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार आमदार राजू नवघरे यांनी व्यक्त केला. हिंगोली येथील हॉटेल शिवलीला पॅलेस सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, पक्ष संघटना मजबुतीकरण तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रदेश नेते प्रकाश थोरात, शेख निहाल, तान्हाजी बेडे, जिजाऊ हरणे, कन्हैया बाहेती, संजय दराडे, शेख नांजिम, वसमतचे उपनगराध्यक्ष शेख इमरान, माजी नगराध्यक्ष राजू देशमुख, संचित गुंडेवार, रवींद्र गडदे, विकास शिंदे, सतीश टापरे, उत्तमराव पोले, बाळु मामा ढोरे, हिंमत राठोड, वैशाली वाघ, विजय डोखळे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, सेलप्रमुख, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

​​​​​​​

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजू नवघरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर उतरून काम करण्याची गरज आहे. विनाकारण मुंबईला निवेदने घेऊन जाण्यापेक्षा बूथ स्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घ्या.” कार्यकर्त्यांचे कान टोचत त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येक गाव, बूथ आणि प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, “पहिल्यांदाच जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला एवढ्या मोठ्या मेळाव्याचे स्वरूप आले आहे. ही उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यात नंबर वन पक्ष बनविणे आता अवघड राहिलेले नाही.” जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांनी सांगितले की, आगामी काळात पक्ष संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले जाईल. पक्षशिस्त, जनसंपर्क आणि संघटनात्मक काम पाहूनच आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यात येईल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या कामाचा सखोल आढावा घेऊनच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी संपर्क अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे नुकत्याच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार होय. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात नगरसेवकांचे अभिनंदन केले.

बैठकीत आगामी काळात उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार यांच्या हिंगोली जिल्हा दौऱ्याचे नियोजन, पक्षाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, युवक व महिला संघटन बळकट करणे, बूथनिहाय बांधणी तसेच आगामी विधान परिषद निवडणुकांच्या रणनीतीवरही चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दराडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रवींद्र गडदे यांनी मानले. या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांसाठी नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्ष संघटना अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.