नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या अतिवृष्टीची

नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या ढगफुटीचा गंभीर इशारा; 300 मिमी पावसाची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर

Nashik Rain Alert

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकसाठी विशेष इशारा; कोकण, मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट, स्थानिक यंत्रणा सज्ज

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात उद्या अतिवृष्टीची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, संभाव्य ढगफुटीमुळे एका दिवसात सुमारे 300 मिमी पावसाची नोंद होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याबाबत विशेष सतर्कतेचा संदेश दिला असून, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, उद्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा हवामान इशारा नाशिक जिल्ह्यासाठी आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी होण्याची शक्यता हवामानाशी संबंधित यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे जवळपास 300 मिमी पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध भागांमध्ये उद्भवू शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने तयारी सुरू केली आहे. घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी झाल्यामुळे विविध प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील मुसळधार पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या आहेत.

याशिवाय, ग्रामीण भागात किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती, दरड कोसळणे अथवा इतर कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन मदत जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राने कोकण आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच पुणे शहरातील शाळांनाही महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट कायम असून, विशेषतः घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.