स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नागेश्वर विकास आराखडा तयार करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ
औंढा नागनाथ मंदिराच्या १८२.८३ कोटींच्या विकास आराखड्याचा पालकमंत्र्यांकडून आढावा
हिंगोली (Nageshwar Temple) : जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या दारुकावने श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिराचा १८२.८३ कोटी रुपयांचा बृहद विकास आराखडा तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच येथील जाणकार नागरिकांशी चर्चा करून त्यानुसार विकासकामे हाती घ्यावीत, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिल्या.
औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला 'अ' वर्ग दर्जाची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पालकमंत्री झिरवाळ यांनी आढावा घेतला.
यावेळी खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, नूतन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, विभागीय सहआयुक्त (नियोजन) सुनील सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ बृहद विकास आराखड्याचे कौतुक करत, नियोजनानुसार कामे झाल्यास मंदिर परिसराचा कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच विकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व जाणकारांना विश्वासात घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी खासदार रामराव वडकुते यांनी मंदिर परिसराच्या विकासात देशातील १२ ज्योतिर्लिंगांची माहिती व दर्शनरांगेत भक्तांना त्यांचे दर्शन घडेल, अशी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मांडला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी १८२.८३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण करताना आतापर्यंत उच्चाधिकार समितीच्या तीन आढावा बैठका झाल्याची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत सर्व विकासकामे करण्यात येणार असून, भक्तांसाठी आधुनिक दर्शनरांग, भक्तनिवास, व्हीआयपी भक्तनिवास, वाहनतळ, नवीन ५६ दुकाने, रुद्राभिषेक व तिकीट काउंटर, स्वच्छता व्यवस्था आणि सुमारे पाच हजार भाविक बसू शकतील अशी दर्शनरांग उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रावण महिन्यात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन जलद दर्शनाची व्यवस्था, मंदिर परिसरात पाणी साचणार नाही यासाठी नियोजन, तसेच रांगेतूनच मंदिराच्या शिखराचे व नागेश्वराचे मुखदर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भक्तांना येणार 'दारुकावने'चा अनुभव
मंदिर परिसरात स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड करून भक्तांना मूळ दारुकावनात आल्याचा अनुभव देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच चालुक्यकालीन प्रवेशद्वार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संरक्षणासाठी ठेवलेले स्तंभ जतन करण्यात येणार आहेत.
याशिवाय दोन पोलीस चौक्या, चप्पल स्टँड, प्रतीक्षालय, दर्शन मंडप, विशेष पूजा-अभिषेक व्यवस्था, मूर्तिसंग्रहालय तसेच मूळ मंदिराभोवती असलेल्या १९ मंदिरांचा विकास करण्यात येणार आहे. हरिहर कुंडाचे पुनरुज्जीवन व मंदिर संवर्धनाची कामेही या आराखड्यात समाविष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.