आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाजिया इलाही खान यांच्यावर कडक कार्यवाही करा
कळमनुरी (Nazia Elahi Khan) : पैगंबराबद्दल कथित आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाजिया इलाही खान यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ जून रोजी राष्ट्रपती यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा तसेच आपल्या धर्मगुरू, पैगंबर आणि धार्मिक व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र नाजिया इलाही खान (Nazia Elahi Khan) या इस्लाम धर्म, पैगंबर आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सातत्याने आक्षेपार्ह व वादग्रस्त विधाने करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून समाजात असंतोष निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या (Nazia Elahi Khan) प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी तसेच भविष्यात कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील विविध पदाधिकारी, नागरिक आणि समाजबांधव उपस्थित होते.