'मातोश्री'वरील बैठकीत ठाकरे गटात जोरदार शाब्दिक वाद; उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा
ठाणे जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदलांच्या बैठकीत दोन गट आमनेसामने; कल्याणमधील हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले
मुंबई: ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर चर्चा करण्यासाठी 'मातोश्री' येथे आयोजित बैठकीत अनपेक्षितपणे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत उपस्थित पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
ठाण्यातील कळवा आणि कल्याण विधानसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावरून दोन गटांमध्ये मतभेद उफाळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बैठकीतील वाद वाढत असल्याचे पाहून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून, "देशात अभिजीत दिपकेसारखा एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहे आणि तुम्ही मात्र पक्षातील पदांसाठी आपापसात वाद घालत आहात," अशा शब्दांत फटकारले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच निर्णयाचा मुद्दा बैठकीत पुन्हा चर्चेत आला. जुने पदाधिकारी आणि नव्या नियुक्त्यांबाबत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे वाद अधिक चिघळल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्व पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.