हिंगोलीत कर्जमुक्तीसाठी 22,194 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
उर्वरित 22,019 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांचे आवाहन
हिंगोली (Hingoli Karj Mukti) : हिंगोली जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 44,213 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 22,194 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून प्रगती 50.19% झाली आहे.
मात्र अजूनही 22,019 लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. प्रमाणीकरण न झाल्यास या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी उर्वरित सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
"कर्जमुक्ती योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी आपल्या जवळच्या बँक शाखा, सहकारी संस्था किंवा सीएससी केंद्र येथे जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. वेळेत प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित रहावे लागेल," असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.
प्रशासनामार्फत गावपातळीवर देखील जनजागृती मोहीम राबवली जात असून शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.