राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रा

कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

Maratha Reservation,

आंतरवलीत पत्रकार परिषदेत गंभीर आरोप; राजकारणासाठी मराठा समाजाचा छळ होत असल्याचा दावा, सरकारवर निशाणा

राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंतरवली येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने या विषयावर गैरसमज निर्माण केला आहे. सरकारकडून राजकीय हेतूने मराठा समाजाचा छळ केला जात असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आज मनोज जरांगे बावनकुळे साहेबांवर प्रमाणपत्र रद्द करण्याचे बेछूट आरोप केले आहेत.आपले मुंबईचे दादा निघाले आहेत अंतरवली सराटी ला,दादा मी येतोय म्हणून.देवाभाऊंचा मालक जनतेशिवाय कोणीही होऊ शकत नाही,जेवढे देवाभाऊंनी मराठा समाजासाठी केले तेवढे कोणी केले नाही तरीसुद्धा मराठ्यांना… pic.twitter.com/dYaz28X2OO

— शुभम कराड (@shubham_9909) August 6, 2026

यावेळी त्यांनी दावा केला की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. संबंधित पत्र अस्तित्वात असल्याचाही दावा जरांगे पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले की, एका आडनावाचे हजारो लोक असताना राजकीय द्वेषातून सर्वांवर कारवाई करणे योग्य नाही. अधिकाऱ्यांना फोन करून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राजकारणासाठी अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी बावनकुळे यांचाही उल्लेख केला. मराठा समाजाची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे अधिकार जर त्यांना दिले, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने मराठा समाजाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ नये, असेही ते म्हणाले.

याशिवाय, मराठा समाजाच्या युवकांचे नुकसान होईल असे निर्णय सरकारने टाळावेत, असे आवाहन करत आपल्या विरोधात भूमिका घेतल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.