महाराष्ट्रात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण सुरू; 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरा, 19 ऑक्टोबरला अंतिम यादी जाहीर
हिंगोली (Maharashtra SIR Campaign) : महाराष्ट्रातील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'विशेष सखोल पुनरिक्षण' प्रक्रिया सुरू केली आहे. याबतचे प्रसिद्धीपत्रक आज जारी करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या मतदार यादीतील प्रत्येक मतदाराने 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून तो घरभेटीसाठी येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील.
17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. प्रारूप यादीत ज्यांचे नाव आढळून येणार नाही किंवा जे नवीन पात्र मतदार आहेत त्यांना आवश्यक कागदपत्रांसह नमुना 6 चा अर्ज भरून नाव नोंदवता येईल. तसेच याच कालावधीत मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8 आणि चुकीची नोंद वगळण्यासाठी नमुना 7 चा अर्ज संबंधित मतदार भरू शकतात. सर्व अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील आणि ही अंतिम यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम 22 आणि 23 नुसार नोंदीत सुधारणा करता येणे शक्य आहे. मतदार यादीची सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असून कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत नमुना 6 द्वारे नाव नोंदवता येते. नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आपला गणना अर्ज भरावा आणि आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करावी असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.