Latur Chakurkar Memorial: लातूरच्या वीरशैव लिंगायत

चाकूरकरांचे स्मारक महापालिका प्रांगणात उभारावे!

Latur Chakurkar Memorial

वीरशैव लिंगायत समाजाच्या असिस्ट मंडळाची महापौर व आयुक्तांकडे मागणी

लातूर (Latur Chakurkar Memorial) : लातूरचे वैभव आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणातच उभारण्यात यावे, अशी मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लातूरच्या महापौर व महापालिका आयुक्तांकडे सोमवारी एका शिष्टमंडळाने केली. चाकूरकरांचे स्मारक अन्यत्र झाल्यास नाराजी निर्माण होवू शकते, असा इशारा या शिष्टमंडळाने दिला.  लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक आदर्श कॉलनीत उभारण्यात येणार असून याबाबत उद्या पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. यापूर्वीच म्हणजे एक ऑगस्ट च्या अंकात दैनिक 'देशोन्नती'ने 'शिवराज पाटील चाकूरकरांच्या स्मारकाबाबत पालिका सभेत होणार चर्चा', असे वृत्त दिले होते. या वृत्तात चाकूरकरांचे स्मारक आदर्श कॉलनी परिसरात उभारण्याचा विषय या महापालिका सभेत येणार असल्याचे म्हटले होते. मात्र तत्पूर्वीच म्हणजे सोमवारी वीरशैव लिंगायत समाजाने चाकूरकरांचे स्मारक महापालिका प्रांगणातच व्हावे, अशी मागणी केल्याने महापालिका सभेत यावर काय चर्चा होते, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवराज पाटील यांनी नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्ष, लातूरचे आमदार, महाराष्ट्र शासनातील मंत्री, लोकसभेचे खासदार, लोकसभेचे सभापती, देशाचे गृहमंत्री तसेच पंजाब राज्याचे राज्यपाल अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करून लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचवले आहे. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी स्मारक महापालिकेच्या प्रांगणातच उभारण्यात यावे. महाराष्ट्र शासन स्मारकासाठी निधी देण्यास तयार असून स्मारक अन्यत्र उभारण्याचा प्रयत्न झाल्यास समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये विशेषत्वाने कन्हेरी चौक येथील कैलासधाम स्मशानभूमीचा प्रश्न आणि माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाच्या उभारणीची मागणी प्राधान्याने करण्यात आली. महापालिका प्रशासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन कैलासधाम स्मशानभूमीचा प्रश्न आणि शिवराज पाटील चाकूरकर स्मारकाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात उमाकांत कोरे, सुनील भीमपूरे, बालाजी पिंपळे, सुहास आष्टगे, अमित पाटील, बंडप्पा जवळे, मन्मथ चिकले, भालचंद्र दानाई, लहू खरोळे, सतीश जोंधळे, शंकर सुगरे, सूर्यकांत हत्ते यांच्यासह समाजबांधवांचा सहभाग होता.