औसा उड्डाणपूल व बायपासला मंजुरी!
गडकरींकडून कोट्यवधींच्या प्रकल्पांना हिरवा कंदील: आ. अभिमन्यू पवारांचा पाठपुरावा यशस्वी
लातूर (Latur-Ausa Flyover) : लातूरच्या आऊटर रिंग रोड साठी तातडीने भूसंपादनाच्या सूचना देत औसा येथे उड्डाणपूल व बायपासला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी (दि. १६) नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रलंबित रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. औसा मतदारसंघातील भूकंपग्रस्त गावांमधून जाणाऱ्या औसा–लामजना–किल्लारी–उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गामुळे निळकंठेश्वर मार्ग, महापुरुष मार्ग, संत मारुती महाराज मार्ग आणि लातूर–औसा–उमरगा महामार्ग यांना जोडणारा दर्जेदार रस्ते कॉरिडॉर तयार होणार आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. याशिवाय, लातूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गरुड चौक ते नवीन रेणापूर नाका या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. औसा येथील उजनी मोड चौकाचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा प्रस्तावालाही मंजुरी देऊन काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार महामार्गांचे चौपदरीकरण, उड्डाणपूल, बायपास, आऊटर रिंगरोड आणि उजनी मोड चौकाची सुधारणा यांसारखे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औसा व लातूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची आ. अभिमन्यू पवार यांनी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औशात उड्डाणपूल आणि बायपासही! औसा शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन (Latur-Ausa Flyover) औसा उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रस्तावित पूर्व बाह्यवळण (बायपास) रस्त्यालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या बायपासमुळे शहरातील अवजड वाहनांची वर्दळ कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे. लातूर नवीन रिंग रोडसाठी भूसंपादनाच्या सूचना! लातूर शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन पेठ–चांडेश्वर–कव्हा–बाभळगाव–भातखेडा–खुलगापूर–नांदगाव–रायवाडी–हरंगुळ–खंडापूर–गंगापूर–पेठ या सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या आऊटर रिंगरोडला राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे सरकत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.