बीड जिल्ह्यातील परळी शहरात भरदिवसा एका तरुणाचे चा

परळीत भरदिवसा तरुणाचे अपहरण; ऊसतोडणीच्या उचल पैशांच्या वादातून थरार, २४ तासांत ३ आरोपी जेरबंद

Kidnapping Case

परभणी जिल्ह्यातील सहा जणांविरुद्ध गुन्हा; बळजबरीने कारमध्ये डांबून नेल्याचा आरोप, उर्वरित तिघांचा शोध सुरू

बीड | परळी (Kidnapping Case) : बीड जिल्ह्यातील परळी शहरात भरदिवसा एका तरुणाचे चारचाकी वाहनातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीच्या कामासाठी घेतलेल्या उचल पैशांच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे हे गंभीर रूप असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परळी शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या २४ तासांत सहा आरोपींपैकी तीन जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील स्वाभिमाननगर परिसरातील रहिवासी विनोद नवनाथ वैरागे यांनी ऊसतोडणीच्या कामासाठी उचल रक्कम घेतली होती. या आर्थिक व्यवहारावरून परभणी जिल्ह्यातील काही व्यक्तींशी त्यांचा वाद सुरू होता.

शुक्रवारी (१९ जून) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान विनोद वैरागे हे परळीतील अरुणोदय मार्केट परिसरात आले असता आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या आर्थिक वादावरून दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून विनोद वैरागे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून तेथून पळ काढला.

या घटनेनंतर राजू प्रल्हाद कांबळे (वय ३०, रा. सोरंझा, जि. परभणी) यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान परभणी जिल्ह्यातील सायखेडा आणि निपाणी येथील सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये आप्पाराव उर्फ माऊली उजगरे, सचिन उजगरे, विश्वजित कदम, गिरीधर पुरी, दीपक चव्हाण आणि सचिन कदम यांचा समावेश आहे. यापैकी तीन प्रमुख आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी परळी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) (अपहरण), ११५(२), ३५१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंगणे या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करीत आहेत.

भरदिवसा घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे परळी शहरात खळबळ उडाली असून गुन्हेगारांच्या वाढत्या धाडसाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.