मालाड जिरेटोप प्रकरणावर पडदा; जैन समाजाच्या शिष्टमंडळाची 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्याकडे लेखी माफी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्याच्या घटनेनंतर जैन समाजाची दिलगिरी; समाजात तेढ निर्माण करणारे प्रकार टाळा, राज ठाकरे यांचा सल्ला
मुंबई (Jiretop) : मुंबईतील मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल जैन समाजाच्या वतीने लेखी माफीनामा सादर करण्यात आला. या भेटीची माहिती राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.
काही दिवसांपूर्वी मालाड (पूर्व) परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या प्रतिकृतीवर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडियावरही या प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यानंतर संबंधितांकडून सार्वजनिकरित्या माफी मागण्यात आली होती.
“राजकीय पक्षांकडून तुमचा वापर केला जातोय. मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, हाच काहींचा उद्देश असावा. सोसायटीमध्ये धर्मगुरू येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी कार्पेट टाका आणि भेट संपल्यानंतर ते काढून टाका. धर्माचे कार्य करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखलेले नाही. जैन… pic.twitter.com/XcPNckUHQ2
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 26, 2026आज झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर आणि मराठी अस्मितेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याच्या अलीकडील वादग्रस्त घटनांचाही उल्लेख केला. अशा कृतींमुळे समाजात अनावश्यक तणाव निर्माण होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, काही राजकीय पक्षांकडून समाजांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. मराठी अस्मितेचा सन्मान राखणे प्रत्येकाची जबाबदारी असून कोणत्याही कारणाने समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कृती टाळल्या पाहिजेत. तसेच जैन समाज आणि मराठी समाजामध्ये निर्माण होणारे वाद तातडीने थांबले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जैन समाजाच्या प्रतिनिधींनी या संपूर्ण घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या भेटीनंतर मालाडमधील वाद शांततेच्या मार्गाने मिटल्याचे चित्र समोर आले असून, मराठी अस्मितेबाबत मनसेची भूमिका पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.