जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा परिसरातून अत्यंत धक

बुलढाणा हादरले! जळगाव जामोदमध्ये एका व्यक्तीने चार मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

Jalgaon Jamod Incident

बुलढाणा (Jalgaon Jamod Incident) : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिनांक २५ मे रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान एका व्यक्तीने आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून विदर्भ हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया (रा. भाले अंजन) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने राजुरा धरण परिसरातील विहिरीत आपल्या चार मुलांसह जीवन संपवलं. या घटनेत प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी घरगुती वादातून माहेरी जाण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या दिवशी सकाळी त्याने आपल्या पत्नीला माहेरी सोडले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर घरातील काम करत असताना वडिलांनी त्याला “तुझी बायको कुठे गेली?” असा प्रश्न विचारला. या बोलण्यावरून घरगुती वाद निर्माण झाल्याचे आणि त्यातूनच टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात विजय किराडियाने चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतःही विहिरीत उडी घेत जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले.

घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथकाने धाव घेतली. विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. घरगुती वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कारणांचा शोध घेण्यात येत असून कुटुंबीय आणि स्थानिकांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण राजुरा आणि भाले अंजन परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.