सावकारीच्या जाचाला कंटाळून २५ कुटुंबांचे पलायन; आमदार बच्चू कडू यांची मध्यरात्री नणंद येथे भेट
निलंगा : निलंगा तालुक्यातील नणंद गावात बेकायदेशीर सावकारीच्या जाचाला कंटाळून तब्बल २५ कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार बच्चू भाऊ कडू यांनी गुरुवारी (दि. ३० जुलै २०२६) मध्यरात्री १२.४५ वाजता मुसळधार पावसात नणंद गावाला भेट देत पीडित कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी आयोजित सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारी आणि काही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना कर्जाच्या नावाखाली मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असून, अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीही राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू यांनी बेकायदेशीर सावकारीचा प्रश्न सभागृहात ठामपणे उपस्थित केला होता. सावकार आणि काही फायनान्स कंपन्यांच्या अन्यायकारक वसुली पद्धतीमुळे अनेक शेतकरी आणि कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता.
पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी, दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत तसेच शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांचा छळ थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नणंद येथील घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितांना त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.